Monday, March 30, 2026

पी. एम. सूर्यघर योजना संपूर्ण जिल्हाभर राबविणार : मंत्री हसन मुश्रीफ, मुख्यमंत्री बळीराजा शेत/ पाणंद रस्ते योजनाही प्रभावीपणे राबविणार


कोल्हापूर, विकास न्यूज नेटवर्क
संपूर्ण जगासाठीच सूर्य हा मोफत ऊर्जेचा कधीही न संपणारा अखंड नैसार्गिक स्त्रोत आहे. याचा पुरेपूर वापर करित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेली "पी. एम. सूर्यघर योजना" संपूर्ण जिल्ह्याभर घरोघरी राबविण्याचा निर्धार वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला. जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात ना. मुश्रीफ यांच्या उपस्थितीत विविध प्रश्नांचा आढावा घेण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे प्रामुख्याने उपस्थित होते .
            
ते म्हणाले, या योजनेमुळे सूर्यप्रकाशाच्या माध्यमातून निर्माण झालेली वीज संबंधिताला मोफत मिळेल.अनुदान वजा जाता सुरुवातीची तीन वर्षे साधारणता दरमहा वीज बिला एवढाच हप्ता बसेल. त्यानंतर दरमहा येणारे वीज बिल शून्य होईल.पर्यायाने,पर्यावरणाच्या संरक्षणालाही हातभार लागेल.पी.एम.सूर्यघर योजनेच्या आढाव्यानंतर मुख्यमंत्री बळीराजा शेत / पाणंद रस्त्यांचा आढावा घेताना श्री मुश्रीफ म्हणाले, शेतकऱ्यांना शेताकडे ये- जा करण्यासाठी,वैरण व गोठ्यांमधून दूध आणण्यासाठी, बी-बियाणे व खतांच्या वाहतुकीसह काढणी केलेली पिके वाहनांमधून घर व विक्रीसाठी नेण्याकरिता तसेच वाड्या-वस्त्यांवरील नागरिकांसह विशेषत: माता-भगिनी व शाळेला ये जा करणाऱ्या बालकांसाठी पाणंद रस्ते म्हणजे जणू जीवनमार्गच आहेत. ज्या-ज्या ठिकाणी शेतकऱ्यांचे वाद नसतील म्हणजेच पर्यायाने त्यांची संमती असेल अशा सर्व ठिकाणी प्रशासनाच्या सहाय्याने पाणंद रस्त्यांची कामे मोठ्या प्रमाणात हाती घेण्यात येणार आहेत. या रस्त्यांमुळे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात सोय होणार असल्याने शेतकऱ्यांनी आप-आपसातील वाद मिटवून या योजनेचा वापर प्रभावीपणे करावा .या अभियानाचा प्रारंभ येत्या १९ एप्रिलपासून कागल, गडहिंग्लज, उत्तूर विधानसभा आदी मतदारसंघातून अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर करणार असल्याचे ना. मुश्रीफ म्हणाले. तसेच दूधगंगा प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांबाबत प्रशासनाने लवकरात लवकर सकारात्मक तोडगा काढून संबंधितांना न्याय द्यावा असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. तर पाणंद रस्त्याबाबत येथे 8 दिवसांमध्ये दर निश्चिती केली जाईल. तसेच ग्रामपंचायतीकडून या रस्त्याच्या अनुषंगाने संबंधित शेतकऱ्यांच्या मागणीनुसार प्रस्ताव मागविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी यावेळी दिली .

पाणंद रस्त्यांसाठी १४ योजनांमधून निधी.....!
या अभियानांतर्गत पाणंद रस्ते हे शंभर टक्के यांत्रिकीकरणातून होणार आहेत.पाणंदी तयार करण्यासाठी सी.एस.आरसह १५ वा वित्त आयोग, खासदार व आमदार यांचा स्थानिक विकास निधी, ग्रामपंचायतींना जन सुविधांकरीता मिळणारे अनुदान तसेच मोठ्या ग्रामपंचायतींना नागरी सुविधांकरीता मिळणारे अनुदान, जिल्हास्तरीय खनिज विकास निधी, ग्रामपंचायतींना मिळणारे महसुली अनुदान, ग्रामपंचायतींचे स्व- उत्पन्न, जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून उपलब्ध होणारा निधी,ग्रामीण भागात गावांतर्गत मूलभूत सुविधा पुरविणे म्हणजेच 25:15, इतर जिल्हा योजना, अनुसूचित व आदिवासी क्षेत्रासाठी पेसा अंतर्गत उपलब्ध निधी, ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती सुधारणा कार्यक्रम, भगवान बिरसा मुंडा जोडरस्ते योजना, आदिवासींसाठी नाविन्यपूर्ण योजना यासारख्या विविध १४ शासकीय योजनांतून निधी उपलब्ध होणार असल्याचे ना. मुश्रीफ म्हणाले. या आढावा बैठकीसाठी अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, पुनर्वसन उपजिल्हाधिकारी श्रीमती वर्षा शिंगण, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता अभिजीत म्हेत्रे, महावितरण अधीक्षक अभियंता गणपत लटपटे, रोहयो उपजिल्हाधिकारी शक्ती कदम, राधानगरी प्रांताधिकारी प्रसाद चौगुले, जिल्हा नियोजन अधिकारी विक्रम देशमुख, अग्रणी बँकेचे व्यवस्थापक मंगेश पवार यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
××××××××××××××××××××××××

No comments:

Post a Comment

सौ. वि. दि. शिंदे हायस्कूलमधील गुणवंत शिक्षक व विद्यार्थ्यांचा सत्कार...

गडहिंग्लज, विकास न्यूज नेटवर्क... कोल्हापूर जिल्हा मराठी अध्यापक संघामार्फत एस. एस. सी. मार्च 2026 मध्ये मराठी विषयात 96 व अधि...