Saturday, April 11, 2026

अशोकअण्णा-सुधीरभाऊ एकत्र आलाय; एकत्रच रहा, आजरा सूतगिरणीवरील कार्यक्रमात मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केले मत, कार्यक्रम रंगला राजकीय टोलेबाजीत....


आजरा, विकास न्यूज नेटवर्क......
अण्णाभाऊ आजरा सूतगिरणीच्या 25 हजार चात्यांच्या मशिनरीच्या पूजनाच्या कार्यक्रमासाठी अण्णाभाऊ संस्था समूहाचे प्रमुख अशोकअण्णा चराटी व जिल्हा बँकेचे संचालक सुधीरभाऊ देसाई हे राजकीय मतभेद असलेले दोघेजण एकत्र आले आहेत. आजरा तालुक्याच्या विकासासाठी यापुढेही दोघांनी एकत्रच राहावे. सोबतीला आजरा साखर कारखान्याचे अध्यक्ष मुकुंददादा देसाई यांना घ्यावे असे मत राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केले. 25 हजार चात्यांच्या पूजन प्रसंगी उपस्थित सर्वच राजकीय नेत्यांनी केलेल्या टोलेबाजीने वातावरणात रंगत आली. याच वेळी मंत्री मुश्रीफ यांनी कोल्हापूर जिल्हा बँकेच्या पुढील संचालक मंडळात अशोकअण्णा व सुधीरभाऊ हे दोघेही संचालक असतील असे संकेत दिले. त्यामुळे आगामी काळात आजरा तालुक्यातील राजकारण वेगळ्या वळणावर जाण्याची शक्यता आहे.
  
अण्णाभाऊ आजरा तालुका सूतगिरणी मध्ये 25 हजार चात्यांचा प्रकल्पाच्या मशनरींचे पूजन कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमासाठी राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री व कोल्हापूर जिल्हा बँकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ, जिल्हा बँकेचे संचालक अर्जुन आबिटकर, जिल्हा बँकेचे संचालक व जिल्हा परिषदेचे नूतन सदस्य सुधीरभाऊ देसाई, राज्य वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी यांच्यासह तालुक्यातील विविध राजकीय नेते व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी सर्वच मान्यवरांनी केलेल्या भाषणात राजकीय टोलेबाजी पहावयास मिळाली. पहिल्यांदा अशोक चराटी यांनी आपल्या भाषणात अर्जुन आबिटकर यांनी केलेल्या सहकार्यामुळेच सुधीर देसाई हे जिल्हा परिषदेला सदस्य झाल्याचे सांगितले. त्यावर बोलताना सुधीर देसाई म्हणाले, मला जिल्हा परिषद सदस्य करण्यामध्ये अर्जुन आबिटकर यांचा हातभार तर आहेच त्याचबरोबर जिल्ह्याचे नेते हसन मुश्रीफ यांचे मोठे योगदान आहे. याबद्दल बोलताना मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, आजरा तालुक्यात शिवसेनेचे उमेदवार उभे करून अर्जुन आबिटकर यांना शिवसेनेचा जिल्हा परिषद अध्यक्ष करायचा होता की तालुक्यात राष्ट्रवादीचे सदस्य निवडून आणण्यासाठी हातभार लावायचा होता हे अद्यापही कळले नाही. राज्य वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी म्हणाले, सध्या वस्त्रोद्योगासाठी अडचणीचा काळ आहे. तरीही अबिटकर बंधूंनी भुदरगड तालुक्यात सुतगिरणी उभा करण्याचे शिवधनुष्य उचलले आहे. तालुक्यातील अगोदरच असलेली माजी आमदार के. पी. पाटील यांनी सूतगिरणी चांगली चालवली आहे. आता मंत्री आबिटकर उभा करत असलेली सूतगिरणी चांगली चालते का हे बघायचे आहे. हाच धागा पकडत मंत्री मुश्रीफ म्हणाले, भुदरगड तालुक्यातील आजी-माजी आमदारांमध्ये अशोक स्वामी यांनी इर्षा निर्माण केली आहे. मात्र दोघांच्याही सूतगिरणी व्यवस्थित चालतील. मंत्री मुश्रीफ आपल्या भाषणात म्हणाले, अशोक चराटी यांच्यासोबत काही मतभेद झाले होते. आता आम्ही दोघे एकत्र आहोत. अनेक विधानसभा निवडणुकीमध्ये ज्यांच्याशी संघर्ष केला, त्या समरजीत घाटगे, संजय बाबा घाटगे यांना सोबत घेऊन कागलच्या विकासासाठी वाटचाल सुरू आहे. जर आबिटकर बंधूंनी इच्छा व्यक्त केली तर माजी खासदार संजय मंडलिक सुद्धा या एक्सप्रेस मध्ये सहभागी होतील. अशोक चराटी यांनी विधानसभा निवडणुकीच्या वेळी मदत केली, त्यामुळे आजरा नगरपंचायत निवडणुकीच्या वेळी विशेष लक्ष घातलं नाही. नगरपंचायत निवडणुकीच्या वेळीच अशोक चराटी व सुधीर देसाई एकत्र यावेत अशी इच्छा होती. याकरता मुकुंद देसाई यांनी पुढाकार घेऊन युती करावी अशी सूचना दिली होती. मात्र दुर्दैवाने मुकुंद देसाई आजारी पडल्यामुळे ती युती आकाराला आली नाही. नाहीतर सध्या आजरा तालुक्यातील राजकीय चित्र वेगळे दिसले असते. या कार्यक्रमाच्या निमित्ताने का होईना? अशोकअण्णा व सुधीरभाऊ एकत्र आले आहेत. तालुक्याच्या विकासासाठी त्यांनी आगामी काळात एकत्रच राहावे. मुकुंद दादा यांना सोबतीला घ्यावे. तसेच सुधीर देसाई व अर्जुन आबिटकर यांची मैत्री देखील कायम राहू, अशी सदिच्छा दिली. त्याचबरोबर राजकारण व निवडणूका होतच राहतील पण तब्येतीची काळजी राखून काम करा असा सल्ला अशोक चराटी यांना मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिला.
==============================

No comments:

Post a Comment

सौ. वि. दि. शिंदे हायस्कूलमधील गुणवंत शिक्षक व विद्यार्थ्यांचा सत्कार...

गडहिंग्लज, विकास न्यूज नेटवर्क... कोल्हापूर जिल्हा मराठी अध्यापक संघामार्फत एस. एस. सी. मार्च 2026 मध्ये मराठी विषयात 96 व अधि...