Saturday, January 24, 2026
लोकवाद्ये ही आपल्या लोकजीवनाचा आत्मा : ऋषिकेश देशमाने, आजरा महाविद्यालयात लोकवाद्यांवरील कार्यशाळा संपन्न...
आजरा, विकास न्यूज नेटवर्क...
लोकवाद्ये ही केवळ लाकूड किंवा चामड्याचे तुकडे नसून, लोकवाद्ये ही आपल्या लोकजीवनाचा आत्मा आहेत. त्यात आपल्या संस्कृतीचा प्राण वसलेला आहे. नवीन पिढीने या वाद्यांचे महत्त्व ओळखून ती शिकणे आणि त्यांचे संवर्धन करणे ही काळाची गरज आहे, असे मत लोकवाद्ये अभ्यासक आणि संग्राहक ऋषिकेश देशमाने यांनी व्यक्त केले. आजरा महाविद्यालयात मराठी विभाग आणि विद्यार्थी विकास विभागाच्यावतीने अग्रणी महाविद्यालय योजनेअंतर्गत 'लोकवाद्ये समजून घेताना' या विषयावरील कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत प्रमुख वक्ते म्हणून श्री. देशमाने बोलत होते. प्राचार्य डॉ. अशोक सादळे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपस्थित होते. यावेळी समन्वयक डॉ. मल्हारराव ठोंबरे, उपप्राचार्य प्रा. दिलीप संकपाळ, कार्यालय अधीक्षक योगेश पाटील उपस्थित होते.
लोकवाद्ये ही मानवी संस्कृतीचा अनमोल ठेवा
आहे. असे सांगून श्री. देशमाने पुढे म्हणाले की, संगीत ही मानवाला निसर्गाकडून मिळालेली सर्वात मोठी देणगी आहे. माणसाने आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी स्वरांचा आणि तालाचा आधार घेतला, त्यातूनच लोकवाद्यांचा जन्म झाला. लोकवाद्ये म्हणजे केवळ मनोरंजनाचे साधन नसून ती आपल्या मातीचा सुगंध, परंपरा आणि लोकसंस्कृतीचा अविभाज्य भाग आहेत. लोकवाद्ये ही त्या त्या प्रदेशाच्या भौगोलिक आणि सांस्कृतिक परिस्थितीचे प्रतिबिंब असतात. महाराष्ट्रातील ढोलकी, तुतारी, संबळ किंवा एकतारी ही वाद्ये इथल्या मातीतील चैतन्य दर्शवतात. सण-उत्सव, जत्रा, लग्नकार्य किंवा शेतीकामाचा थकवा घालवण्यासाठी ही वाद्ये वाजवली जातात. ही वाद्ये आपल्या पूर्वजांच्या जीवनशैलीची ओळख करून देतात. लोकवाद्यांचा आवाज समाजातील सर्व स्तरांतील लोकांना एकत्र आणतो. लोक आपापसातील भेद विसरून एकत्र येतात. भजन, कीर्तन, भारुड किंवा पोवाडा यांसारख्या लोककलांमधून सामाजिक प्रबोधन करण्याचे काम ही वाद्ये करतात. समाजात एकोपा टिकवून ठेवण्यासाठी लोकवाद्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. लोकवाद्यांच्या माध्यमातून आनंद, उत्साह, भक्ती आणि कधीकधी दुःखही व्यक्त केले जाते. बहुतेक लोकवाद्ये ही निसर्गातील वस्तूंपासून बनलेली असतात. लाकूड, चामडे, बांबू, माती आणि धातू यांचा वापर करून ही वाद्ये तयार केली जातात. यामुळे मानवाचे निसर्गाशी असलेले अतूट नाते अधोरेखित होते. ही वाद्ये वाजवताना जो नाद निर्माण होतो, तो निसर्गातील आवाजांशी साधर्म्य राखणारा असतो. लोकवाद्ये बनवणे ही एक मोठी कला आहे. यामुळे अनेक कारागिरांना रोजगार मिळतो. मात्र आजच्या आधुनिक युगात पाश्चात्य वाद्यांच्या अतिवापरामुळे आपली पारंपरिक लोकवाद्ये काहीशी मागे पडत आहेत. या वाद्यांचे जतन करणे म्हणजे आपल्या वारशाचे जतन करणे होय. म्हणूनच लोकवाद्यांचा हा नाद असाच घुमत राहिला तरच आपली संस्कृती जिवंत राहील, असे मत श्री. देशमाने यांनी व्यक्त केले. या कार्यशाळेत आजरा, गडहिंग्लज, चंदगड तालुक्यातील सर्व महाविद्यालयातील निवडक विद्यार्थी आणि शिक्षक सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे स्वागत डॉ आप्पासो बुडके यांनी, प्रास्ताविक मराठी विभाग प्रमुख डॉ. आनंद बल्लाळ यांनी, पाहुण्यांची ओळख अथर्व मोहिते याने करून दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रुती कांबळे आणि निदा इंचनाळकर यांनी तर विवेक कोंडूसकर याने उपस्थितांचे आभार मानले. विक्रांत सावंत, समृद्धी तांबेकर, विवेक पाटील, संचिता तरडेकर, परशुराम राणे, प्रथमेश कुंभार , सुप्रिया घुरे, श्रेया पसारे, ऋतुजा धडाम यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले.
°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°
Subscribe to:
Post Comments (Atom)
सौ. वि. दि. शिंदे हायस्कूलमधील गुणवंत शिक्षक व विद्यार्थ्यांचा सत्कार...
गडहिंग्लज, विकास न्यूज नेटवर्क... कोल्हापूर जिल्हा मराठी अध्यापक संघामार्फत एस. एस. सी. मार्च 2026 मध्ये मराठी विषयात 96 व अधि...
-
आजरा, विकास न्यूज नेटवर्क : आजरा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी सहा तर नगरसेवक पदासाठी 57 उमेदवार रिंगण...
-
आजरा, विकास न्यूज नेटवर्क... संक्रातीच्या सणादिवशी पतंग उडवत असताना लाकडी ओंडका अंगावर पडल्याने आदर्श किरण पोवार (वय 11, सध्या...
-
आजरा, विकास न्यूज नेटवर्क.... रस्ता ओलांडत असताना अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत सोहाळे पैकी सोहाळेवाडी (ता. आजरा) येथील प्रशां...
No comments:
Post a Comment