सलाइनमधून विष देण्याचा डाव, हे सारं फडणवीसांचं षडयंत्र; जरांगेंचे उपमुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप
मुंबई वृत्तसंस्था :
मला संपवण्याचा डाव देवेंद्र फडणवीस करताय, मी मरावं अस देवेंद्र फडणवीसांना वाटतं, असे गंभीर आरोप मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर केले आहेत. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील हे उपोषणावर बसले आहेत. आज अंतरवालीसराटीत त्यांनी महत्त्वाची बैठक घेतली. यावेळी त्यांनी फडणवीसांवर गंभीरस्वरुपाचे आरोप केले. तसेच, बैठक संपल्यानंतर ते स्वत: पायी चालत मुंबईतील फडणवीसांच्या सागर बंगल्याच्या दिशेने निघाले.
मनोज जरांगे काय म्हणाले?
'मी एक सामान्य शेतकऱ्याचा पोरगा म्हणून बसलो आहे. माझी समाजावर निष्ठा आणि प्रेम आहे. म्हणून हे घडलं आहे. मी स्वार्थी, लबाड असतो तर कधीच उघडा पडलो असतो. मी एक सामान्य म्हणून तुमच्यासाठी काम करतोय. माझा देव समाज आणि समाजावर माझी निष्ठा आहे. आजची शेवटची आणि निर्णायक बैठक आहे. मराठ्यांना हरवण्याचं स्वप्न बघत आहेत, म्हणून ही बैठक लवकर घ्यावी लागली'. 'छत्रपतींच्या समक्ष बसून सांगतो, मी कुठल्याच पक्षात नाही, कुठल्याही पक्षाच्या वतीने काम करत नाही, उद्धव ठाकरेंचं सरकार होतं तेव्हाही त्यांना बोललो होतो आता यांचं आहे तरी बोलतो. म्हणजे मी कुठल्याच पक्षाचा नाही, मी माझ्या समाजाचा आहे. समाजापुढे कोणीच नाही'. 'सरकार देतंय १० टक्के आरक्षण आणि आपण मागतोय ओबीसीतून सरसकट मराठ्यांना आरक्षण. तुम्हाला सरसकट द्यायचं नसेल तर ज्या मराठ्यांची नोंद सापडली नाही त्यांच्यासाठी सगेसयोऱ्यांचा कायदा पारित करा. त्यांच्याच म्हणण्यावर आपण ही मागणी केली. त्यांनीच आपल्याला सांगितलं होतं की सरसकट ते देत नाही. मग आपण नवा पर्यायी शब्द काढू सगेसोयरे'. 'हे सगळं करतोय तो फक्त एकटा देवेंद्र फडणवीस', असं म्हणत मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्र्यांवर घणाघात केला. पुढे ते म्हणाले, 'मी आज टोकाचा निर्णय घेणार आहे. मराठ्यांचा दरारा पुन्हा एकदा राज्यावर निर्माण झाला आहे. हा दरारा संपवण्याचं त्यांचं (फडणवीस) स्वप्न आहे. त्यात एकनाथ शिंदेंचेही एक-दोन लोक आहेत. अजित पवारांचेही दोन आमदार आहेत. सगेसोयऱ्यांचं होऊ द्यायचं नाही, काहीही करुन १० टक्के मराठ्यांवर लादायचं आणि हे पोरगं ऐकतच नाही, हे पोरगं इथंच संपलं पाहिजे, नाहीतर याचा गेम तरी करावा लागेल. याला बदनाम तरी करावं लागेल, याला उपोषणात मरु द्यावं लागेल, म्हणून सोळावा दिवस उजाडला. याचं काहीतरी करावं लागेल, सलाइनमधून विष देऊन, म्हणून मी परवा रात्रीपासून सलाइन बंद केलं. नाहीतर याचं एन्काउंटर करावं लागेल, हे देवेंद्र फडणवीसचं स्वप्न आहे' असे गंभीर आरोपही त्यांनी केले. 'देवेंद्र फडणवीसला एवढीच कुणकुणी आहे ना तर मी बैठक संपल्यावर सागर बंगल्यावर येतो मला मारून टाका. माझा बळी पाहिजे ना, मी येतो सागर बंगल्यावर घे बळी. समाजाशी इमानदारी मी नाही विकू शकत', असं म्हणत जरांगेंनी फडणवीसांना थेट आव्हान दिलं. 'त्यांचं नाही ऐकलं तर ते माणूस संपवतो. त्याला पुढं गेलेलं खपत नाही. एखादी जात मोठी झाली तर त्यांना जमत नाही. मराठे जर एका बाजुने झाले आणि हा पोरगा राहिला तर आपला विषय संपला. मग याला बदनाम केल्याशिवाय पर्याय नाही'. 'फडणवीस यांचं ऐकलं नाही तर काय होतं हे सांगतो, एकनाथ खडसे कधीच भाजप सोडू शकत नाही, त्यांना जावं लागलं. अजित पवार राष्ट्रवादी सोडू शकत नाही, त्यांना जेलची भीती दाखवून पक्ष फोडायला लावला. विनोद तावडेंना दिल्लीला जावं लागलं. पंकजा मुंढे हे पक्षात असून नसल्यासारखं आहे. एकनाथ शिंदे कधीच शिवसेना सोडू शकत नाही, नाइलाजाने सोडावी लागली. अशोक चव्हाण पक्ष सोडू शकत नाही, तरी सोडला. भुजबळांचं अजित पवारांशी जमत नसूनही ते त्यांच्या गटात, दुसऱ्यांदा जेलमध्ये टाकेल या भीतीने ते अजितदादांसोबत गेले'. माझा बळी घ्यायचा आहे ना, उपोषण करत मी पायी सागर बंगल्यावर येतो. मेलो तर त्याच्या दारात नेवून टाका, असंही मनोज जरांगे यांनी बैठकीत सांगितलं.
=======================
No comments:
Post a Comment