साखर चोरीसारखी प्रकरणे झाकण्यासाठीच आजरा साखर कारखान्यात राष्ट्रवादीला एकहाती सत्ता गरजेची होती
आजरा येथील पत्रकार परिषदेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तानाजी देसाई यांचा आरोप
आजरा वृत्तसेवा :
अध्यक्ष निवडीच्या मुहूर्तावरच आजरा साखर कारखान्यात साखर चोरी प्रकरण घडले आहे. याप्रकरणी केवळ जुजबी कारवाई करण्यात आली आहे. या साखर चोरी प्रकरणातील मुख्य सूत्रधार शोधण्याची गरज आहे. सत्ता आल्याबरोबर साखर चोरी प्रकरण घडवून आणून कारखाना लुटण्यास सुरुवात करण्यात आली आहे. आगामी पाच वर्षात याहीपेक्षा भयानक प्रकार घडतील. असे कारखान्याला तोट्यात घालणारे प्रकार झाकण्यासाठीच राष्ट्रवादीला आजरा साखर कारखान्यात एक हाती सत्ता हवी होती, असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष तानाजी देसाई यांनी आजरा येथील पत्रकार परिषदेत केला.
देसाई पुढे म्हणाले, साखर चोरी प्रकरणी नूतन अध्यक्ष धुरे यांनी दिलेला खुलासा हास्यास्पद आहे. काटामारी करून बेकायदेशीरपणे तयार करण्यात आलेली साखर जाणीवपूर्वक बाहेर काढण्यात आली आहे. साखर भरलेला ट्रक कोणतीही शहानिशा न करता बाहेर जाऊ देण्यात आला आहे. यामागे मोठे षडयंत्र लपलेले आहे. याप्रकरणी जुजबी कारवाई करून प्रश्न सुटणार नाही तर या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन चौकशी करण्याची गरज निर्माण झाली आहे. पोलीस गुन्हा नोंद करून पंचनामा करून साखर उतरून घेतली पाहिजे होती. कारखान्यात पारदर्शी कारभार करणार म्हणून निवडणूक जिंकलेल्या विद्यमान संचालकांचा हा कसला पारदर्शी कारभार सुरू आहे असा सवाल ही त्यांनी उपस्थित केला. साखर चोरी हा प्रकार विद्यमान संचालक व प्रशासनाच्या सहमतीनेच झाला आहे. मात्र अशा प्रकरणामुळे कारखान्यावरील शेतकऱ्यांचा विश्वास कमी होणार आहे ही कारखान्यासाठी मारक ठरणारी गोष्ट आहे, अशीही देसाई म्हणाले. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका उपाध्यक्ष संजय देसाई, श्रीपती गुरव, धोंडीबा सावंत, नरेंद्र कुलकर्णी उपस्थित होते
No comments:
Post a Comment