Wednesday, October 29, 2025

इको झोन साठी 'आजरा' ने सर्वोच्च न्यायालयात दाद मागावी : मंत्री हसन मुश्रीफ; आजरा कारखान्याचा गळीत हंगाम शुभारंभ

आजरा, विकास न्यूज नेटवर्क : 
आजरा साखर कारखाना ३० वर्षांपूर्वीचा आहे. इको सेन्सिटिव्ह झोन त्यानंतर लागला आहे, मात्र याचा फटका कारखान्याला बसला आहे. आजरा कारखाना संचालकांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागून सवलत मिळवावी असे आवाहन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. कारखान्याचा गळीत हंगाम शुभारंभ नाम. मुश्रीफ यांच्या हस्ते झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री प्रकाश आबिटकर होते.
     
स्वागत व प्रास्ताविक कारखाना अध्यक्ष मुकुंद देसाई यांनी केले. आपला कारखाना केवळ साखर निर्मिती करत चालला आहे.कोणताही उपपदार्थ प्रकल्प नाही.खर्च वाढत असल्याने तोट्याचे गणित आहे.इको झोन काढावे यासाठी सर्व प्रयत्न सुरु आहेत शासनाच्या कर्जावरील व्याज माफ व्हावे व भागभांडवलासाठी दिलेल्या कर्जाला हप्ते पाडून मिळावेत यासाठी प्रस्ताव पाठविला आहे. गेल्यावर्षी २.७५ लाख मे.टन तालुक्यात ऊसाचे उत्पादन झाले मात्र आपल्या कारखान्याला १.८४ लाख मे.टन ऊस गाळपासाठी आला. कारखाना चालण्यासाठी कोणतेही मतभेद न आणता कारखान्याला ऊर्जितावस्था आणण्यासाठी ऊस आपल्या कारखान्याला देवून योगदान द्यावे असे आवाहन केले. मंत्री मुश्रीफ म्हणाले, वर्षातील ३ महिने काम व नंतर ९ महिने कामगारांना पगार द्यावा लागतो. ५ लाख मे.टन गाळप झाल्याशिवाय कारखान्याचे गणित बसत नाही. स्पर्धेमुळे अधिक एफआरपी द्यावी लागते. केवळ साखर निर्मिती करुन फायदा होत नाही.उपपदार्थ प्रकल्प जोडीला हवेत. सोलर,सीएनजी सारखे प्रकल्प आजराने करावे. जिल्हा बॅंक सहकार्य करेल. इको झोन साठी न्यायालयात जावून आपले दुखणे मांडून सवलत मिळवावी. एआय पद्धतीचा अवलंब कारखान्याने करावा. साखरेचे भाव वाढल्यास जनतेतून नाराजी येईल यासाठी केंद्र सरकार एफआरपी वाढवणार नाही.
जिल्ह्यातील सर्व कारखान्यांसाठी जिल्हा बँक सातत्याने पाठिशी राहील. मंत्री आबिटकर म्हणाले, प्रकल्प झाले आहेत. ऊसाचे क्षेत्र वाढविण्यासाठी कारखान्याने प्रयत्न करणे गरजेचे आहे.आजरा तालुका सहकारातील समृद्ध म्हणून जिल्ह्यात पाहिला जातो. राजकारण केवळ निवडणूकीपुरते असावे. कारखान्याला गती देण्यासाठी सर्वांचे सहकार्य करावे असे आवाहन केले. आभार काशिनाथ तेली यांनी मानले. कार्यक्रमास उपाध्यक्ष सुभाष देसाई, जेष्ठ संचालक वसंतराव धुरे, विष्णू केसरकर यांच्यासह सर्व संचालक, संघाचे उपाध्यक्ष डि.ए.पाटील व सर्व संचालक, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष सुधीर कुंभार, शिरीष देसाई, कार्यकारी संचालक संभाजी सावंत यांच्यासह ऊस उत्पादक शेतकरी, सभासद, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
====================

Tuesday, October 28, 2025

‘गोकुळ’मार्फत डॉ. चेतन नरके यांचा सत्कार

कोल्हापूर, विकास न्यूज नेटवर्क :
कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघ (गोकुळ) संघाचे संचालक डॉ.चेतन अरुण नरके यांची महाराष्ट्र राज्याचा नवीन सहकार धोरण समितीवर नियुक्ती झाल्याबद्दल त्‍यांचा सत्कार गोकुळ परिवारच्यावतीने संघाचे चेअरमन नविद मुश्रीफ यांचे हस्‍ते व सर्व संचालक मंडळाच्‍या उपस्थितीमध्ये गोकुळ प्रकल्प गोकुळ शिरगाव येथे करण्‍यात आला.
          
यावेळी बोलताना संघाचे चेअरमन नविद मुश्रीफ म्हणाले, राष्ट्रीय सहकार धोरण २०२३ मधील शिफारसीचा अभ्यास करून राज्याच्या दृष्टीने सहकार धोरण ठरवणेसाठीच्या महाराष्ट्र राज्याच्या समितीवर डॉ. चेतन नरके यांची नियुक्ती होणे संघाच्या दृष्टीने अभिमानास्पद आहे. डॉ. नरके यांना त्यांच्या भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या. सत्काराला प्रतिसाद देताना डॉ. चेतन नरके यांनी सांगितले की, “गोकुळ परिवाराकडून मिळालेल्या सत्काराबद्दल मनःपूर्वक आभार. हा सन्मान मला फक्त वैयक्तिक नाही तर आपल्या संपूर्ण सहकार क्षेत्रासाठी मिळालेला आहे असे वाटते. महाराष्ट्र राज्याच्या नवीन सहकार धोरण समितीवर मला नियुक्त करून मला सहकार क्षेत्रातील कार्य अधिक परिणामकारकपणे पुढे नेण्याची संधी दिली गेली आहे. यासाठी मला माझ्या सहकाऱ्यांचे आणि गोकुळचे योगदान नेहमीच मार्गदर्शन करणारे राहिले आहे. भविष्यातही मी सहकार क्षेत्रातील प्रत्येक सदस्यांसाठी कार्य करण्यास कटिबद्ध आहे.”
         
तसेच यावेळी कोल्हापूर जिल्हा दूध संस्था कर्मचारी संघटनेच्या वतीने, गोकुळ दूध संघाने अलीकडेच गाय व म्हैस दूध खरेदी दरात वाढ, तसेच संस्था कमिशनमध्ये प्रति लिटर १० पैसे, सचिव कमिशनमध्ये ५ पैशांची वाढ, आणि महालक्ष्मी पशुखाद्याच्या दरात ५० रुपयांची कपात केल्याबद्दल संघाचे चेअरमन व संचालक मंडळाचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी संघाचे चेअरमन नविद मुश्रीफ, माजी चेअरमन व ज्येष्‍ठ संचालक विश्वास पाटील, अरुण डोंगळे, संचालक बाबासाहेब चौगले, अजित नरके, शशिकांत पाटील–चुयेकर, किसन चौगले, रणजितसिंह पाटील, नंदकुमार ढेंगे, कर्णसिंह गायकवाड, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, अमरसिंह पाटील, बयाजी शेळके, बाळासो खाडे, चेतन नरके, युवराज पाटील, राजेंद्र मोरे, मुरलीधर जाधव, संचालिका श्रीमती अंजना रेडेकर, सौ. शौमिका महाडिक, कार्यकारी संचालक डॉ.योगेश गोडबोले, संघाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
===================

गोकुळकडून लवकरच ‘गोकुळ केसरी कुस्ती’ स्पर्धा पुन्हा सुरू : गोकुळ दूध संघ चेअरमन नविद मुश्रीफ

कोल्हापूर, विकास न्यूज नेटवर्क :
कोल्हापूर जिल्ह्यातील परंपरागत कुस्ती संस्कृतीला गोकुळ दूध संघाने नेहमीच प्रोत्साहन दिले आहे. काही वर्षांपासून बंद असलेली ‘गोकुळ केसरी कुस्ती’ स्पर्धा आता गोकुळ मार्फत पुन्हा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती गोकुळ दूध संघाचे चेअरमन नविद मुश्रीफ यांनी दिली. संचालक मंडळाच्या बैठकीत या विषयावर चर्चा होवून निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले. यापूर्वी गोकुळच्या वतीने राज्य व राष्ट्रीय स्तरावरील गोकुळ केसरी कुस्ती स्पर्धा आयोजित केल्या जात होत्या. मात्र काही कारणांमुळे मागील काही वर्षांपासून या स्पर्धांना विराम मिळाला होता. अलीकडे कोल्हापुरातील विविध तालीम संघटनांचे पदाधिकारी, मल्ल व कुस्तीप्रेमी यांनी संघाचे संचालक, नेतेमंडळी आणि चेअरमन यांची भेट घेऊन स्पर्धा पुन्हा सुरू करण्याची मागणी केली होती. या मागणीचा सकारात्मक विचार करून संचालक मंडळाच्या आज झालेल्या बैठकीत स्पर्धा पुन्हा सुरू करण्याचा सर्वानुमते निर्णय घेण्यात आला आहे.
         
निवडणुकीचा कालावधी संपल्यानंतर लगेचच या स्पर्धांचे आयोजन करण्यात येईल, असे मुश्रीफ यांनी स्पष्ट केले. गोकुळच्या माध्यमातून जिल्ह्यातील तरुण पिढीला परंपरागत कुस्ती खेळाकडे आकर्षित करून या मातीतून नव्या मल्लांना घडविण्याचा हेतू असल्याचे त्यांनी नमूद केले. कुस्ती हा कोल्हापूरच्या परंपरेचा अविभाज्य भाग असून, गोकुळच्या माध्यमातून या खेळाला नवे बळ मिळेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. यावेळी संघाचे चेअरमन नविद मुश्रीफ, माजी चेअरमन व ज्येष्‍ठ संचालक विश्वास पाटील, अरुण डोंगळे,  संचालक  बाबासाहेब चौगले, अजित नरके, शशिकांत पाटील–चुयेकर, किसन चौगले, रणजितसिंह पाटील, नंदकुमार ढेंगे, कर्णसिंह गायकवाड, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, अमरसिंह पाटील, बयाजी शेळके, बाळासो खाडे, चेतन नरके, युवराज पाटील, राजेंद्र मोरे, मुरलीधर जाधव, संचालिका श्रीमती अंजना रेडेकर, सौ. शौमिका महाडिक, कार्यकारी संचालक डॉ.योगेश गोडबोले, संघाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
=====================

वन्यप्राण्यांमुळे झालेल्या नुकसानीत संपूर्ण शेती क्षेत्राचा विचार करावा : पालकमंत्री प्रकाश आबिटकर; वाहनांच्या नुकसानीसाठीही मिळणार मदत

कोल्हापूर, विकास न्यूज नेटवर्क :
एका भागात वारंवार हत्ती किंवा इतर वन्यप्राणी येऊन त्याच शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्यास त्या संपूर्ण शेती क्षेत्राचा विचार करून भरपाई निश्चित करावी. जिल्ह्यात वन्यप्राण्यांमुळे होत असलेल्या सततच्या शेतीच्या नुकसानीबाबत पंचनामे वेळेत पूर्ण करावेत, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी, अशा सूचना सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिल्या. आजरा तालुक्यातील आणि आसपासच्या गावांमध्ये हत्तींसह इतर वन्यप्राण्यांमुळे शेतकऱ्यांचे तसेच नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. या संदर्भात ग्रामस्थांनी पालकमंत्री आबिटकर यांना निवेदन देत भरपाई मिळावी आणि वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांवर नियंत्रणासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर शासकीय विश्रामगृह, कोल्हापूर येथे वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीला उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील, संबंधित आरएफओ तसेच प्रभावित गावांतील ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील यांनी विशेष बाब म्हणून याबाबत पंचनामे करुन संबंधित शेतकऱ्यांना योग्य प्रकारे भरपाई देण्याबाबत कार्यवाही करणार असल्याचे सांगितले.

बैठकीदरम्यान ग्रामस्थांनी मांडलेल्या समस्या ऐकून घेताना पालकमंत्री आबिटकर म्हणाले की, शासनाने याबाबत स्प्ष्ट शासन निर्णयाद्वारे मदत देण्यासाठी नियम केले आहेत. त्यानुसार योग्य पद्धतीने करावेत. पंचनामे केवळ एकदाच न करता वास्तविक नुकसानाचे वस्तुनिष्ठ मूल्यमापन व्हावे. तसेच, वन्यप्राणी दिसल्यानंतर त्वरित संरक्षण दल घटनास्थळी पोहोचेल, यासाठी यंत्रणा तत्पर ठेवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. एकाच भागात वारंवार प्राणींची हालचाल होत असल्यास त्यांना अन्य भागात हलविण्याचे प्रयत्न करावेत, अशीही सूचना वन विभागाला करण्यात आली. याशिवाय, वन्यप्राण्यांमुळे वाहनांचे झालेले नुकसानही मदतीच्या कक्षेत आणावे, असे निर्देशही पालकमंत्री आबिटकर यांनी यावेळी दिले. या बैठकीत पालकमंत्री आबिटकर यांनी नागरिकांना सहकार्य न करणाऱ्या तसेच पंचनामे वेळेत न झालेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी असे निर्देश दिले. येत्या आठ दिवसांत वनहक्क दावे मार्गी लावण्यासाठी तालुक्यात वन विभाग, महसूल विभाग व ग्रामस्त यांची संयुक्त बैठक घेऊन सर्व प्रश्न तातडीने सोडवले जाणार आहेत. तसेच तेथील जल जीवन मिशन अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या योजनेसाठी वन विभागाने तातडीने मंजुरी द्यावी अशाही सूचना त्यांनी वन विभागाला दिल्या. वन विभागाकडून राबविण्यात येत असलेल्या गैस कनेक्शन आणि सुरक्षा जाळी योजनेच्या अनुषंगाने ही कार्यवाही करण्याच्या सूचना बैठकीत करण्यात आल्या.
===============

Monday, October 27, 2025

आरोग्य सेवांबाबत सनियंत्रण प्रणाली प्रभावी करा : आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर; कोल्हापूर जिल्ह्यात एक दिवस आरोग्यासाठी मोहीम राबविण्यात येणार

कोल्हापूर, विकास न्यूज नेटवर्क :
आरोग्य उपकेंद्रापासून जिल्हा रुग्णालयापर्यंतच्या सर्व आरोग्यविषयक भौतिक सुविधांचा पुरेपूर वापर होण्यासाठी, नागरिकांना आरोग्य सेवा गुणवत्तापूर्ण देण्यासाठी प्रत्येक स्तरावर सनियंत्रण प्रणाली प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले. प्रत्येक ठिकाणच्या सनियंत्रणातून काम योग्य पद्धतीने होत असल्याची खात्री करता येईल. सनियंत्रण प्रणाली मार्फत त्या त्या ठिकाणी भेटी देत असलेल्या सेवांची पडताळणी तसेच कामकाजाचा आढावा योग्य पद्धतीने घेता येईल असेही ते यावेळी म्हणाले. त्यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील आरोग्य विभागाचा शासकीय विश्रामगृह कोल्हापूर येथील राणी इंदुमती सभागृहात आढावा घेतला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद कार्तिकेयन एस., आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. दिलीप माने, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.प्रशांत वाडीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अनिरुद्ध पिंपळे, कार्यकारी अभियंता पाणीपुरवठा, उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाणी व स्वच्छता यांच्यासह संबंधित विभागाचे व राष्ट्रीय आरोग्य मिशन मधील सर्व अधिकारी उपस्थित होते. प्रभावी सनियंत्रणाच्या सूचना करीत असताना त्यांनी आढळून आलेल्या त्रुटींबाबत गांभीर्याने लक्ष देत संबंधितावर कारवाई करण्याचेही निर्देश दिले.

या अनुषंगाने त्यांनी जिल्ह्यात लवकरच ’एक दिवस आरोग्यासाठी’ उपक्रम राबवून अभियान स्वरूपात प्रत्येक गाव-वाडी-वस्तीवर आरोग्यविषयक उपक्रम राबविण्याचे निर्देश दिले. यामध्ये गावातील शौचालयांच्या सेप्टिक टाकीच्या पाईपला जाळ्या बसवणे, गप्पी माशांचा वापर करणे, गावातील जलसुरक्षकाला प्रशिक्षण देणे, पाणी तपासणी मोहीम राबविणे आणि आयुष्यमान भारत कार्ड वितरित करणे अशा पाच घटकांचा समावेश एक दिवस आरोग्यासाठी अभियानात करण्यात यावा अशा सूचना केल्या. या उपक्रमाबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांनी माहिती दिली. नागरिकांचे आरोग्य सुस्थितीत राहावे, गाव स्तरावर वेगवेगळे साथीचे आजार होऊच नयेत यासाठी स्वच्छता व पाणी या अनुषंगाने नागरिकांना माहिती मिळावी तसेच शासकीय आरोग्यविषयक योजनांचा प्रसार व्हावा या अनुषंगाने हे अभियान राबविण्यात येणार आहे. बैठकीत पालकमंत्री आबिटकर यांनी जिल्ह्यातील कामकाज राज्यासाठी आदर्शवत व्हावे यासाठी आरोग्य विभागाने चांगल्या प्रकारे उपलब्ध असलेल्या सुविधांचा वापर करीत नागरिकांना आरोग्यसेवा उपलब्ध कराव्यात अशा सूचना केल्या. ते म्हणाले रुग्णवाहिका, तालुका स्तरावर आरोग्य केंद्रांमध्ये उपलब्ध असलेले ईसीजी सुविधा, सार्वजनिक पिण्याच्या पाण्याचे स्रोत तपासणी, तसेच गावाची पाणी व स्वच्छतेमधील असलेली जबाबदारी याबाबत सविस्तर माहिती व जनजागृती करावी. आरोग्य विभागाच्या सुविधांबाबत सर्वसामान्यांमध्ये सकारात्मक भावना निर्माण व्हावी यासाठी प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखून काम करावे असे निर्देश त्यांनी दिले.
==================

Sunday, October 26, 2025

आजरा नगरपंचायतीसाठी सना चाँद यांच्या उमेदवारीची मागणी

आजरा, विकास न्यूज नेटवर्क :
राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींचे बिगुल कोणत्या एक क्षणी वाजू शकत. सुरुवातीच्या टप्प्यात नगरपालिका व नगरपंचायत निवडणुका होण्याची चिन्हे आहेत. यामुळे सर्वच शहरी भागामध्ये निवडणुकांची जोरदार तयारी इच्छुकांच्या मधून सुरू आहे. गेल्या अडीच वर्षाहून अधिक काळ रखडलेली आजरा नगरपंचायत निवडणुकीही तोंडावर येऊन ठेपली आहे. आजरा नगरपंचायतीच्या आगामी निवडणुकीसाठी प्रभाग आरक्षण व मतदार याद्या प्रसिद्ध झाले आहेत. या पार्श्वभूमीवर सारेच इच्छुक कामाला लागले आहेत. यातच आता आजरा नगरपंचायतीच्या प्रभाग क्रमांक दहा मधून सना चाँद यांनी कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवावी,  यासाठी प्रभागातील नागरिक मागणी करू लागले आहेत. प्रभागातील युवा वर्गाचा देखील मोठा प्रतिसाद मिळत आहे. एका सर्वसामान्य घरातील युवकाने आपले प्रतिनिधित्व करावे, यासाठी प्रभागातील सर्वच नागरिक सना चाँद यांना भेटून आपला पाठींबा व्यक्त करत आहेत. त्यामुळे प्रभाग क्रमांक दहा मध्ये उमेदवार ठरवताना सर्वच नेतेमंडळींना सना चाँद यांचा विचार करावा लागणार आहे.

सर्वसामान्य घरातील असलेल्या सना चाँद या युवकाने समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो, या निस्वार्थ भावनेने सामाजिक कार्य सुरू केले आहे. विविध माध्यमातून समाजातील उपेक्षित व गरजू घटकांना त्यांनी मदत केली आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिक व विशेषतः युवा वर्ग यांच्याकडून त्याला मोठा पाठिंबा मिळत आहे. याची प्रचिती त्यांचा नुकताच साजरा झालेल्या वाढदिवसाच्या वेळी साऱ्यांनाच आली आहे. त्यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला सर्वपक्षीय नेतेमंडळी उपस्थित होते. उपस्थित सर्वांनीच आपल्या मनोगतामध्ये चाँद यांच्या सामाजिक कामाचे तोंड भरून कौतुक केले. यातूनच त्यांच्या कार्याची महती नेते मंडळाच्या पर्यंत पोहोचल्याचे सिद्ध होते. त्यामुळे सना चाँद यांच्यासाठी आगामी काळात पोषक वातावरण असल्याचे दिसून येत आहे.

सना चाँद यांच्या एकंदरीत वाटचालीत त्यांच्या कुटुंबीयांचे मोलाचे योगदान राहिले आहे. त्याचबरोबर रसूल लाडजी, निहाल चाँद, शमशुद्दीन चाँद, जमीर लाडजी, इरफान नेसरीकर, अझरुद्दीन दरवाजकर, इरफान दरवाजकर, मुस्ताक खेडेकर, मुजीब मुराद, मुबारक चाँद, असिफ हिंग्लजकर या मित्रांची देखील मोलाची साथ लाभली आहे. ही साथ आगामी काळात देखील अशीच कायम राहून, सना चाँद यांना आजरा नगरपंचायत मध्ये नगरसेवक म्हणून पाठवण्याचा निर्धार साऱ्यांनी केला आहे.
==========================

Friday, October 24, 2025

गोकुळ मार्फत ‘गोकुळ श्री’ स्पर्धेचे आयोजन; जास्तीत जास्त दूध उत्पादकांनी सहभाग घ्यावा : गोकुळ चेअरमन नविद मुश्रीफ

कोल्हापूर, विकास न्यूज नेटवर्क : 
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ लि. (गोकुळ) यांच्या वतीने यावर्षीही ‘गोकुळ श्री’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, गोकुळ संलग्न सर्व दूध उत्पादकांना या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन गोकुळचे चेअरमन नविद मुश्रीफ यांनी केले आहे. दूध उत्पादन वाढीस प्रोत्साहन देणे व उत्पादकांचा सन्मान करणे हा उद्देश ठेवून गोकुळ दूध संघ दरवर्षी जास्तीत जास्त दूध देणाऱ्या गायी व म्हैशींसाठी ही प्रतिष्ठेची स्पर्धा आयोजित करतो. यावर्षीची ‘गोकुळ श्री’ स्पर्धा दिनांक २० नोव्हेंबर २०२५ ते २९ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत कोणत्याही दिवशी घेण्यात येणार आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी इच्छुक दूध उत्पादकांनी आपल्या संस्थेच्या लेटरहेडवर चेअरमन/सचिव यांच्या सही आणि शिक्क्यानिशी अर्ज करून दि. ८ नोव्हेंबर २०२५ पर्यंत संघाच्या बोरवडे, लिंगनूर,  तावरेवाडी,  गोगवे,  शिरोळ व ताराबाई पार्क येथील कार्यालयात नोंदणी करावी. सहभागी होणाऱ्या म्हैशीने किमान १२ लिटर व गायीने किमान २० लिटर प्रतिदिन दूध देणे आवश्यक आहे.
         
या स्पर्धेतील विजेत्यांना म्हैस १ ते ३ क्रमांक व गाय १ ते ३ क्रमांक अशा सहा क्रमांकांना बक्षीस, शिल्ड व प्रमाणपत्र देऊन ‘गोकुळ श्री’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. स्पर्धेबाबतच्या नियम व अटींची सविस्तर माहिती प्राथमिक दूध संस्थांना स्वतंत्र परिपत्रकाद्वारे देण्यात आली आहे. या उपक्रमाद्वारे गोकुळ संघ दूध उत्पादकांना अधिक उत्पादनासाठी प्रेरित करीत असून, उत्पादकांचा सन्मान करण्याची परंपरा जपली जात आहे. जिल्ह्यातील सर्व दूध उत्पादकांनी ‘गोकुळ श्री’ स्पर्धेत उत्साहाने सहभागी व्हावे, असे आवाहन गोकुळचे चेअरमन नविद मुश्रीफ यांनी केले आहे.
==============

Thursday, October 23, 2025

आजऱ्याच्या जनता गृहतारण संस्थेमध्ये दिपावली पाडव्याला १ कोटी ९८ लाख ४५ हजार ५०० रुपये ठेवींचे संकलन

आजरा, विकास न्यूज नेटवर्क :
जनता सहकारी गृहतारण संस्था मर्या., आजरा संस्थेमध्ये आजरा, गडहिंग्लज, गारगोटी, कोल्हापूर, इचलकरंजी, सांगली व पाटणे फाटा (चंदगड) शाखांमध्ये मिळून दीपावली पाडव्याच्या दिवशी तब्बल १ कोटी ९८ लाख ४५ हजार ५०० रुपये इतक्या ठेवींचे संकलन झाले, अशी माहिती जनता सहकारी गृहतारण संस्थेचे अध्यक्ष मारुती मोरे यांनी दिले.

संस्थेने कर्मचाऱ्यांना दिपावलीनिमित्त वाढीव वेतन वाढ दिलेने सर्व कर्मचाऱ्यांनी एकजूटीने प्रयत्न केलेने संस्थेमध्ये ठेवीचे प्रमाण वाढले असून ठेवीदारांचा व हितचिंतकांचा विश्वास वाढला आहे. "महाराष्ट्र राज्य "कार्यक्षेत्र मिळवणारी महाराष्ट्रातील एकमेव गृहतारण सहकारी संस्था आहे व आसो ९००१: २०१५ मानांकन प्राप्त संस्था आहे ही संस्थेची जमेची बाजू आहे. सर्व शाखा संगणीकृत आहेत. संस्था गृहकर्जासाठी १ कोटी ५० लाख पर्यंत व प्लॉट खरेदीसाठी १ कोटी पर्यंत कर्ज देते व सोनेतारण कर्ज या सारख्या विविध गोष्टीसाठी संस्था कर्ज पुरवठा करत आहे. संस्थेकडे SMS सुविधा. लाईट बील भरणा, RTGS / NEFT या सुविधा चालु आहेत. गडहिंग्लज व कोल्हापूर या ठिकाणी स्वमालकीच्या इमारतीत संस्थेची कार्यालये आहेत. सभासद, ठेवीदार व हितचिंतक यांनी दाखविलेल्या प्रचंड विश्वासाबददल व कर्मचारी यांनी ठेव संकलनासाठी केलेल्या विशेष परिश्रमाबददल संस्थेचे चेअरमन मारुती मोरे व व्हा. चेअरमन प्रो. (डॉ) अशोक बाचूळकर व संचालक मंडळ, मॅनेजर मधूकर खवरे व प्रशासकीय अधिकारी मारूती कुंभार यांनी सर्वांचे अभिनंदन केले व ठेवीदारांचे आभार व्यक्त केले.
===============

Wednesday, October 22, 2025

आजरा अर्बन बँकेकडे दीपावली पाडव्यानिमित्त ९ कोटी ५४ लाखाच्या ठेवी जमा

आजरा, विकास न्यूज नेटवर्क :
दि आजरा अर्बन को-ऑप. बँक लि., आजरा (मल्टी-स्टेट) या बँकेकडे दीपावली पाडव्याच्या शुभमुहूर्तावर एका दिवसात १२५८ नवीन खाती उघडून तब्बल ९ कोटी ५४ लाख रुपयांच्या ठेवी जमा झाल्या आहेत. ग्रामीण भागात स्थापन झालेल्या व शहरी भागातही शाखा असणाऱ्या बँकेवर आजही सभासद, ठेवीदार व हितचिंतकांच्या दृढ विश्वासामुळे ग्राहकांनी बँकेकडे मोठ्या प्रमाणात ठेवी ठेवल्या आहेत. सध्या बँकेकडे १०८२ कोटी ०२ लाख रूपयाच्या ठेवी व ६७७ कोटी ०४ लाख रुपयाची कर्जे असून एकूण मिश्र व्यवसाय १७८९ कोटी ०६ लाख इतका झाला आहे. त्याबाबत बँकेचे चेअरमन व अण्णा भाऊ संस्था समुहाचे प्रमुख अशोकअण्णा चराटी, व्हा. चेअरमन संजय चव्हाण व संचालक मंडळ यांनी सर्व ठेवीदार, सभासद व हितचिंतक यांचे आभार मानले व सर्वांना बँकेच्या वतीने दीपावली पाडव्याच्या शुभेच्छा दिल्या.

बँकेने केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध अनुदानाच्या योजना राबविल्या असून आधुनिक अशा FCO कार्य प्रणालीच्या माध्यमातून बँकेत सेव्हिंग खाती उघडण्याची सुविधा आहे. केंद्र शासनाची PMFME (सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग) व PMEGP व राज्य शासनाची अण्णासाहेब पाटील महामंडळ कर्ज योजना, मोबाईल बैंकिंग, IOS application, Google Pay, PhonePe, Paytm, QR Code तसेच Whatsapp Banking च्या माध्यमातून सर्व ग्राहकांना आपल्या बँकेतील त्यांच्या सर्व खात्यांचे statement पाहणे, चेक बुक रिक्वेस्ट देणे, खाते ब्लॉक करणे इ. सुविधा उपलब्ध आहेत याचा फायदा ग्राहकांनी घ्यावा असे आवाहन बँकेचे चेअरमन व अण्णा भाऊ संस्था समूह प्रमुख अशोक चराटी यांनी केले आहे.
===============

आजऱ्याच्या स्वामी विवेकानंद पतसंस्थेमध्ये दीपावली पाडवा मुहूर्तावर एकाच दिवशी २ कोटी ७६ लाख ४९ हजार १११ रुपये ठेव संकलन

आजरा, विकास न्यूज नेटवर्क :
आजरा येथे स्वामी विवेकानंद नागरी सहकारी पतसंस्था मर्या., आजरा या संस्थेने दीपावली पाडव्याच्या शुभमुहूर्तावर संस्थेच्या सभासद, ठेवीदार, खातेदार यांनी दिलेल्या उत्स्फुर्त प्रतिसादाच्या जोरावर संस्थेने अवघ्या एका दिवसात तब्बल रू. २ कोटी ७६ लाख ४९ हजार १११ इतके ठेव संकलन करत संस्थेच्या आर्थिक बळकटीकरणाचा व आपल्या विश्वासार्हतेचा ठसा उमटवला आहे.

सभासदांचा आणि ठेवीदारांचा वाढता विश्वास हीच संस्थेच्या प्रगतीची खरी ताकद आहे. सभासदांच्या हिताचे दृष्टीने व संस्थेच्या आर्थिक स्थैर्यासाठी संस्था सातत्याने नावीन्यपूर्ण योजना राबवते. संस्थेच्या संचालक मंडळाच्या नियोजनबध्द कार्यपध्दती आणि सभासदांच्या विश्वासामुळेच हे विक्रमी ठेव संकलन करणे साध्य झाल्याचे संस्थेचे चेअरमन दयानंद सिध्दाप्पा भुसारी यांनी सांगितले. या ठेव संकलनामुळे पतसंस्थेच्या आर्थिक स्थैर्यात आणखी भर पडली आहे. तसेच समाजाला आर्थिकदृष्टया भक्कम आधार देण्याचे ध्येय साध्य करण्यासाठी संस्था कटिबध्द असल्याचे त्यांनी सांगितले

संस्थेकडे रू. ४ कोटी ५६ लाख वसुल भागभांडवल, रू. १८० कोटी २५ लाख ठेवी, रू. १५१ कोटी २८ लाख कर्जवाटप, रू. ४४ कोटी १४ लाख बँक गुंतवणूक व ऑडिट वर्ग सत्तत 'अ' असून एकूण ९ शाखा कार्यरत आहेत. सर्व ठिकाणी संस्थेच्या स्वमालकीच्या इमारती आहेत. संस्थेच्या सर्व शाखांकडे ऑनलाईन वीज बिल, फोनबिल, डीटीएच रिचार्ज, सोनेतारण कर्जाची सोय, मनिट्रान्स्फर करणेची सोय, एनईएफटी, आरटीजीएस, क्यू आर कोड, आयएमपीएस, एसएमएस इ. अनेक सुविधा सभासदांकरिता उपलब्ध करण्यात आल्या आहेत. संस्थेच्या सर्व शाखा संगणकीकृत आहेत. संस्थेला राज्यपातळीवरील अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

संस्थेचे सभासद, ठेवीदार, ग्राहक, हितचिंतक यांनी संस्थेवर दाखविलेल्या प्रचंड विश्वासाबद्दल व कर्मचारी यांनी ठेव संकलनासाठी केलेल्या विशेष परिश्रमाबद्दल संस्थेचे चेअरमन दयानंद सिध्दाप्पा भुसारी, व्हा. चेअरमन सुधीर बाबुराव कुंभार, सरव्यवस्थापक अर्जुन रामा कुंभार व संचालक मंडळ यांनी सर्वांचे आभार मानले.
=======================

Tuesday, October 21, 2025

शासकीय मदतीपासून एकही बाधित वंचित राहू नये : जिल्हाधिकारी अमोल येडगे

कोल्हापूर विकास न्यूज नेटवर्क :
महाराष्ट्र राज्यात जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये अतिवृष्टी व पूर आपत्तीमुळे अनेक नागरिक शेतकरी बाधित झाले आहेत या बाधितांसाठी त्यांना राज्य शासनाने विशेष मदत (रिलीफ - पॅकेज) घोषित केले आहे. या विशेष मदतीतून कोल्हापूर जिल्ह्यातील एकही बाधित वंचित राहू नये असे निर्देश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिले. राजर्षी शाहू सभागृहात दुष्काळ सदृश्य परिस्थितीत लागू असणाऱ्या सवलती देण्याच्या दृष्टीने बैठक आयोजित करण्यात आली होती .

येडगे पुढे म्हणाले, शासनाने कोल्हापूर जिल्ह्यातील कागल , शिरोळ , पन्हाळा हे अंशतः बाधित तर करवीर, राधानगरी, गगनबावडा , आजरा व चंदगड हे तालुके पूर्णतः बाधित असल्याचे जाहीर केले असून याभागातील नागरिकांसाठी नागरिकांसाठी शेतकऱ्यांसाठी शासनाने जमीन महसुली सूट , सरकारी कर्जाचे पुनर्गठन, शेती निगडित कर्जाच्या वसुलीस एका वर्षासाठी स्थगिती दिली आहे. तिमाही वीज बिलात माफी (सूट) त्याचबरोबर इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा शुल्कात माफी जाहीर केली आहे. राज्य शासनाने या सवलती जाहीर केल्या असून या सवलतीच्या अनुषंगाने एकही व्यक्ती मदतीपासून वंचित राहणार नाही याची दक्षता संबंधितांनी घ्यावी. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित तालुक्यांमध्ये शासकीय मदतीपासून कोणी वंचित राहिले आहे का याचा दुरदृष्यप्रणालीद्वारे आढावा घेतला. या बैठकीसाठी निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, सर्वसाधारण तहसीलदार स्वप्निल पवार, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते .
=================

"विकास न्यूज दिवाळी विशेषांक 2025"

विकास न्यूज या न्यूज चॅनेलच्या वतीने विकास दिवाळी 2025 हा विषय अंक प्रकाशित करण्यात आला आहे. वेळेअभावी छपाई केलेली पुस्तिका (दिवाळी अंक) सर्वांपर्यंत पोहोचणे शक्य नसल्यामुळे सदरचा दिवाळी अंक सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्यासमोर सादर करत आहोत. याचा आनंद आपण घ्यावा हि विनंती. हा अंक तयार करत असताना या अंकासाठी लेख देणारे लेखक, जाहिरातदार, हितचिंतक या सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद... सर्वांना दीपावलीच्या मनःपूर्वक शुभेच्छा...
आपला, 
विकास सुतार 
संपादक, विकास न्यूज 
(9049969625)




इचलकरंजी पाणी पुरवठा व जीएसटी परतावा प्रश्नी लवकरच कार्यवाही : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; छत्रपती संभाजी महाराज ‘श्री शंभू तीर्थ’ पुतळ्याचे अनावरण

इचलकरंजी, विकास न्यूज नेटवर्क : महाराष्ट्राचे मिनी मँचेस्टर म्हणून ओळख असलेल्या आणि औद्योगिक कामगार नगरी असलेल्या इचलकरंजी शहरा...