Thursday, September 25, 2025

सभासदांनी 15 हजारची शेअर्स रक्कम पूर्ण करावी; आजरा साखर कारखान्याच्या वार्षिक सभेत अध्यक्ष मुकुंद देसाई यांचे आवाहन

आजरा, विकास न्यूज नेटवर्क :
महाराष्ट्र राज्य शासनाने राज्यातील सर्व सहकारी साखर कारखान्यांची शेअर्स रक्कम पंधरा हजार रुपये केलेली आहे. त्यास वसंतराव देसाई आजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मंजुरी मिळून कार्यवाही सुरू आहे. भविष्यात सभासदांना कोणतेही लाभ देताना अपुऱ्या शेअर्स रक्कमेमुळे अडचणी निर्माण होत आहेत. अपुरी शेअर्स रक्कम पूर्ण केल्या सभासद साखर व इतर लाभ देणे सोयीचे होईल. तसेच कारखान्याच्या भाग भांडवलामध्ये वाढ होऊन कारखान्याच्या आर्थिक स्थितीत हातभार लागला जाईल. त्यामुळे आजरा साखर कारखान्याची अपुरी शेअर्स रक्कम असणाऱ्या सभासदांनी उर्वरित रक्कम भरून पंधरा हजार रुपयेचा शेअर्स पूर्ण करावा, असे आवाहन कारखान्याचे अध्यक्ष मुकुंद देसाई यांनी केले. ते गवसे (ता. आजरा) येथे वसंतराव देसाई आजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या 35 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्ष स्थानावरून बोलत होते.

उपाध्यक्ष सुभाष देसाई यांनी स्वागत केले. संचालक शिवाजी नांदवडेकर यांनी श्रद्धांजली ठराव मांडला. साखर कारखान्याला जास्तीत जास्त ऊस पुरवठा करणाऱ्या 21 शेतकऱ्यांचा संचालकांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. अध्यक्ष मुकुंद देसाई पुढे म्हणाले, आजरा साखर कारखाना स्थापनेपासूनच अनेक अडचणीवर मात करत वाटचाल करीत आहे. सध्याच्या कारखान्याच्या मशनरी खूप जुनी आहेत, त्यामुळे त्या पूर्ण क्षमतेने चालवताना तक्रार येतात. तसेच अन्य कारखान्यांची गाळप क्षमता आणि उसाची उपलब्धता यामुळे कमीत कमी दिवसात जास्तीत जास्त गाळप करणे ही काळाची गरज झाली आहे. सध्या तालुक्यात पावसाचे प्रमाण वाढल्यामुळे एकरी सरासरी ऊस उत्पादन घटत चालले आहे. तसेच साखर उताऱ्यात देखील घट होत आहे. आजरा साखर कारखाना उभारणीपासून आजतागायत केवळ साखर उत्पादनावर अवलंबून आहे. वाढत्या उत्पादन खर्चाचा विचार करता केवळ साखर उत्पादन करून कारखान्याची आर्थिक घडी बसणार नाही, त्याकरिता इथेलॉन, डिस्टिलरी सारखे उपपदार्थ निर्मिती प्रकल्प उभारणे गरजेचे आहे. मात्र कारखाना कार्यक्षेत्र असलेली गवसे व दर्डेवाडी ही गावे शासनाच्या इकोसिन्सिटीव्ह झोनमध्ये येत असल्याने उपपदार्थ निर्मितीस परवानगी मिळणे अडचणी येत आहेत. कारखान्याचे संचालक मंडळ कारखान्याची आर्थिक घडी बसवण्यासाठी आवश्यक ते वेगळे पर्याय काढून त्यावर एकमुखी निर्णय घेत आहे. सभासदांनी ज्या विश्वासाने कारखान्याची धुरा संचालक मंडळाच्या हाती दिली आहे त्या विश्वासाने कारखान्याचा कारभार सुरू आहे.

कार्यकारी संचालक संभाजी सावंत यांनी नोटीस वाचन केले. यावेळी गोकुळ संचालिका अंजना रेडेकर यांनी 2 हजार 700 लोकांनी पाच हजार रुपये भरलेले आहेत. त्यांचा पूर्ण शेअर्स करून घेतला जात नाही. त्यामुळे त्यांना सभासदत्व नाही आणि कारखान्याचा कोणताही लाभ नाही अशी त्यांची अवस्था झाली आहे. त्यामुळे त्यांचे पाच हजार रुपये परत करा अशी मागणी केली. माजी अध्यक्ष सुनील शिंत्रे यांनी मशिनरीवर अनावश्यक खर्च झाले आहेत त्यातून कारखान्याला कोणताही फायदा झाला नाही, असा प्रश्न उपस्थित केला. तानाजी देसाई म्हणाले, शेतकऱ्यांची देणे ताळेबंदात दिसत नाहीत त्यामुळे ताळेबंद चुकीचा आहे. कारखान्याने काटा व इतर उपकरणासाठी एआय तंत्रज्ञान वापरावे अशी मागणी देखील केली. कॉ. संपत देसाई म्हणाले, गेल्या 13 वर्षात कारखाना कर्जातून का बाहेर पडला नाही याचे संचालकाने आत्मचिंतन करावे. सुनील शिंदे यांनी सरसकट सर्व सभासदांना 50 किलो साखर देण्याची मागणी केली. कॉ. शांताराम पाटील यांनी वाढीव शेअर्स रक्कम शेतकऱ्यांच्या ऊस बिलातून कपात करण्यात येऊ नये अशी मागणी केली. यावेळी झालेल्या चर्चेत युवराज पोवार, गुरु गोवेकर, उदय कोडक, गणपती सांगले, पांडुरंग सावरकर, तुळसाप्पा पोवार यांनी सहभाग घेतला. यावेळी जिल्हा बँक संचालक सुधीर देसाई, संचालक विष्णू केसरकर, उदय पवार, दीपक देसाई, रणजीत देसाई, संभाजी पाटील, वसंत धुरे, काशिनाथ तेली, अशोक तर्डेकर, हरी कांबळे, रचना होलम, मनीषा देसाई, नामदेव नार्वेकर, रशीद पठाण, दिगंबर देसाई यांच्यासह महादेव पाटील धामणेकर, शिरीष देसाई, मारुती देसाई, डी. ए. पाटील, राजू होलम यांच्यासह सभासद, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. संचालक मारुती घोरपडे यांनी आभार मानले.
===============

No comments:

Post a Comment

सौ. वि. दि. शिंदे हायस्कूलमधील गुणवंत शिक्षक व विद्यार्थ्यांचा सत्कार...

गडहिंग्लज, विकास न्यूज नेटवर्क... कोल्हापूर जिल्हा मराठी अध्यापक संघामार्फत एस. एस. सी. मार्च 2026 मध्ये मराठी विषयात 96 व अधि...