Tuesday, March 11, 2025

स्वच्छ व मुबलक पाण्यासाठी सर्वपक्षीयांचा आजरा नगरपंचायतीवर मोर्चा

आजरा, विकास न्यूज नेटवर्क :

आजरा शहरातील नागरिकांना स्वच्छ व मुबलक पाणी मिळावे, या मागणीसाठी नागरिकांनी आजरा नगरपंचायतीवर मोर्चा काढला. आजरा शहरातील सर्वपक्षीय कार्यकर्ते व आजरा रहिवासी अन्याय निवारण समिती यांच्यावतीने पाण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला. छत्रपती संभाजी चौक ते आजरा नगरपंचायत कार्यालय असा मोर्चा काढण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर या मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. दरम्यान नगरपंचायत प्रशासक व आजरा भुदरगडचे प्रांताधिकारी हरीश सूळ यांच्यासोबत आजरा शहरातील पाणी प्रश्नाबाबत येत्या चार दिवसात बैठक होऊन शहरवासीयांच्या पाणी पट्टी बाबतचा निर्णय होणार आहे.

यावेळी बोलताना कॉ. संपत देसाई म्हणाले, पाण्यासाठी महिलांना मोर्चा काढावा लागतो ही खेदाची गोष्ट आहे. 27 कोटी रुपये खर्च करून नागरिकांना मुबलक पाणी मिळत नसेल, तर मग पैसा नेमका गेला कुठे? हे तपासणी गरजेचे आहे. घरापर्यंत पाणी येण्यासाठी झारीतले शुक्राचार्य अडचणीचे ठरत आहेत. हे झारीतले शुक्राचार्य ओळखण्याची गरज आहे. आजरा शहराच्या पाणी प्रश्नाबाबत नगरपंचायत प्रशासन झोपेचे सोंग घेत आहे. जनता बँकेचे अध्यक्ष मुकुंद देसाई म्हणाले, आजरा शहरातील पाणीपुरवठ्याचा बोजवारा उडाला आहे. त्यातच पाणी योजनेच्या कामासाठी रस्त्यांची देखील मोठ्या प्रमाणावर खुदाई झाली आहे. पाण्याची नियोजन बिघडल्यामुळे माता-भगिनींना मनस्ताप सहन करावा लागत आहे. शहरवासीयांची परिस्थिती क्लेशदायक झाली आहे. पाणी प्रश्नाबाबत नगरपंचायत प्रशासन उडवा उडवीची उत्तरे देऊन शहरवासीयांची दिशाभूल करत आहे.

नाथ देसाई म्हणाले, सध्या आजरा शहराला कोणीही वाली राहिला नाही. शहरातील पाणी योजना म्हणजे दाल में कुछ काला असा प्रकार तर आहेच पण आता सब दाल काली असे दिसू लागले आहे. रहिवासी अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष परशुराम बामणे म्हणाले, 27 कोटीच्या नव्या पाणी योजनेचे पाणी अद्यापही सुरू झालेले नाही. काळ्या यादीतील ठेकेदाराला पाणी योजनेचे काम देऊन असा भ्रष्ट ठेकेदार आजरेकरांच्या माथी मारण्याचे पाप कोणी केले? हे तपासले पाहिजे. गेले दोन वर्ष आजरा शहरवासीयांना व्यवस्थित पाणी मिळालेले नाही, त्यामुळे दोन वर्षाची पाणीपट्टी आजरा नगरपंचायतीने माफ करावी, अशी मागणी ही त्यांनी केली. यावेळी दयानंद भोपळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

दरम्यान मोर्चातील शिष्टमंडळाने नगरपंचायत मुख्याधिकारी सुरज सुर्वे यांच्याकडे गेल्या दोन वर्षात शहरवासीयांना व्यवस्थित पाणीपुरवठा झालेला नाही, त्यामुळे दोन वर्षाची पाणीपट्टी माफ करावी असे सांगितले. याचा निर्णय प्रशासक घेऊ शकतात असे सुर्वे यांनी शिष्टमंडळाला सांगितले. त्यानुसार जिल्हा बँक संचालक सुधीर देसाई यांनी प्रशासक तथा प्रांताधिकारी हरीश सूळ यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. त्यानुसार सूळ यांनी आगामी चार दिवसात आजरा शहराच्या पाणी प्रश्नाबाबत बैठक घेऊन पाणीपट्टी बाबत निर्णय घेऊ असे सांगितले.

यावेळी जिल्हा बँक संचालक सुधीर देसाई, जनार्दन टोपले, संजय सावंत, सुधीर कुंभार, रवींद्र भाटले, विजय थोरवत, नौशाद बुड्डेखान, विक्रमसिंह देसाई, सचिन इंदुलकर, गौरव देशपांडे, पांडुरंग सावरकर, ज्योतिबा आजगेकर, बंडोपंत चव्हाण, यशवंत चव्हाण, राजू विभुते यांच्यासह लता वर्डेकर, स्वप्नाली गावडे, सुशीला कांबळे, मंगल वंजारे, रोजीनो कुटीनो, अनिता शिंत्रे, रंजना नेवरेकर, मीना पाटील, संगीता बुरुड, नाजमीया आगा, मस्ताना आगा, शीला पाचवडेकर यांच्यासह नागरिक उपस्थित होते.
==================

No comments:

Post a Comment

आजरा नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक उमेदवार निहाय मिळालेले मतदान...

आजरा, विकास न्यूज नेटवर्क : आजरा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी सहा तर नगरसेवक पदासाठी 57 उमेदवार रिंगण...