महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीचे बिगुल वाजले, 20 नोव्हेंबर रोजी मतदान तर 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी
नवी दिल्ली, वृत्तसंस्था :
बहुप्रतिक्षित महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचे बिगुल अखेर वाजले आहे. मंगळवारी दुपारी साडेतीन वाजता पत्रकार परिषद घेत केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र व झारखंड विधानसभेच्या निवडणुकांची घोषणा केली. महाराष्ट्र विधानसभेच्या 288 जागांसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. या सर्व जागांचा निकाल 23 नोव्हेंबर रोजी जाहीर होणार आहे. याचबरोबर महाराष्ट्र राज्यात आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. त्याचबरोबर आता राज्यातील राजकीय घडामोडींना वेग येणार आहे.
अधिसूचना जारी : 22 ऑक्टोबर
अर्ज भरणे शेवटचा दिवस : 29 ऑक्टोबर
अर्जांची छाननी : 30 ऑक्टोबर
अर्ज माघारी : 4 नोव्हेंबर
मतदान : 20 नोव्हेंबर
मतमोजणी : 23 नोव्हेंबर
सध्याच्या महाराष्ट्र विधानसभेची मुदत 26 नोव्हेंबर 2024 रोजी संपत आहे. गतवेळी सप्टेंबर महिन्यात आचारसंहिता सुरू होऊन ऑक्टोबर महिन्यात मतदान झाले होते. त्यामुळे यावेळी नेमकी आचारसंहिता कधी सुरू होणार याकडे साऱ्यांचेच लक्ष लागून होते. गेल्या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये राज्याच्या राजकारणात मोठा उलटफेर झाला आहे. महाविकास आघाडीची अडीच वर्षांची सत्ता तर त्यानंतर माहितीची अडीच वर्षांची सत्ता राहिली आहे. शिवसेना व राष्ट्रवादी या पक्षांची फुटून दोन शकले झाले आहेत. त्यामुळे राज्याच्या राजकारणात आता सहा प्रमुख पक्ष आहेत. भाजप, शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी अजित पवार गट यांची महायुती विरोधात काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट व राष्ट्रवादी शरद पवार गट यांची महाविकास आघाडी असा सरळ सामना वरकरणी दिसत आहे. काही ठिकाणी बंडखोरांचे देखील आव्हान राहणार आहे. त्यातच मनसे, तिसरी आघाडी व वंचित बहुजन आघाडी यांचा प्रभाव देखील काही ठिकाणी राहणार आहे. त्यामुळे 2024 ची महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक मोठ्या चुरशीने होणार हे निश्चित आहे.
====================
बातमी व जाहिरात क्षेत्रातील विश्वसनीय
विकास न्यूज
सत्याचे प्रतिबिंब......
(संपर्क : 7410168989)
=======================
No comments:
Post a Comment