Thursday, October 31, 2024

जयवंतराव शिंपी गटाचा माजी आमदार के. पी. पाटील यांना पाठिंबा; आजरा येथे मेळावा

जयवंतराव शिंपी गटाचा माजी आमदार के. पी. पाटील यांना पाठिंबा; आजरा येथे मेळावा 
आजरा, वृत्तसेवा : 

आजरा तालुक्याचे ज्येष्ठ नेते व कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष जयवंतराव शिंपी यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह आगामी विधानसभा निवडणुकीत राधानगरी विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार माजी आमदार के. पी.  पाटील यांना पाठिंबा जाहीर केला आहे. आजरा येथे शिंपी गटाच्या कार्यकर्त्यांच्या झालेल्या मेळाव्यात हा निर्णय घेण्यात आला आहे. यावेळी बोलताना माजी आमदार के. पी. पाटील म्हणाले, पुरोगामी विचार सुदृढ करण्यासाठी महाराष्ट्राच्या विधानसभेवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकवूया. माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष जयवंतराव शिंपी म्हणाले, राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येण्यासाठी माजी आमदार के. पी. पाटील यांना साथ देऊया.  
 स्वागत व प्रास्ताविक करताना युवा नेते अभिषेक शिंपी म्हणाले, आमच्या राजकीय वाटचालीत जिल्ह्याचे नेते सतेज उर्फ बंटी पाटील आमच्या पाठीशी ठाम उभे आहेत. त्यामुळे त्यांचे नेतृत्व मोठे करण्यासाठी आम्ही त्यांनी दिलेल्या निर्णयाशी बांधिल आहोत. माजी आमदार के. पी. पाटील पुढे म्हणाले, राज्यातील महायुतीचा प्रवाह जातीवाचक आहे, ही धर्मांध शक्ती वाढू नये यासाठी राहुल गांधी, शरद पवार, उद्धव ठाकरे प्रयत्न करत आहेत. त्यामुळे साऱ्यांनी त्यांच्या पाठीशी ठामपणे राहण्याची गरज आहे. राज्यात सध्या अनागोंदीचे वातावरण निर्माण झाले आहे, त्यामुळे राज्याच्या भवितव्याचा विचार करून निर्णय घेण्याची गरज आहे. काँग्रेसच्या विचारांचे पाईक म्हणून गेली अनेक वर्ष जयवंतराव शिंपी कार्यरत आहेत. आजरा शहर व तालुक्यात अनेक जाती-धर्माचे लोक एकत्र राहतात. या सर्वांना पुढे घेऊन जाण्याचे काम शिंपी यांनी केले आहे. राजकारणामुळे काही मतमतांतरे निर्माण झाली आहेत पण सारे मतभेद विसरून एक दिलाने पुन्हा काम करूया. कोल्हापूर जिल्ह्याला बंटी पाटलांसारखे डोळस नेतृत्व लाभलेले आहे. भविष्यकाळात अभिषेक शिंपी यांना आजरा तालुक्यात राजकीय बळ देण्यासाठी अग्रेसर राहीन. त्यांच्यावर कोणताही अन्याय होणार नाही याची काळजी घेतली जाईल. सध्याचे विद्यमान आमदार दहा वर्षांपूर्वी आमदार झाले त्यावेळी त्यांच्या नावावर वीस गुंठे जमीन होती. आत्ता त्यांच्या मालकीची शेकडो एकर जमीन आहे. पाटगावच्या धरणामुळे भुदरगड तालुका सुजलाम सुफलाम झाला आहे. मात्र हा प्रकल्प थेट अदानीलाच विकण्याचे षडयंत्र विद्यमान आमदारांनी केले. विद्यमान आमदारांना कोणतेही सामाजिक भान नाही, केवळ टक्केवारी व कमिशन वर पोसलेले हे आमदार आहेत, त्यामुळे अशा आमदाराला थोपवणे ही काळाची गरज आहे.
 जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष जयवंतराव शिंपी म्हणाले, आमची भूमिका नेहमी स्पष्टपणे असते. माझ्या कारकिर्दीमध्ये साखर कारखाना सुस्थितीत चालला होता. बिद्री साखर कारखानाही के. पी. पाटलांच्या नेतृत्वात आदर्शवत सुरू आहे. राज्याला पुढे घेऊन जाणारा विचार महाविकास आघाडीकडे आहे. जिल्ह्याचे नेते सतेज उर्फ बंटी पाटील यांची शक्ती के. पी. पाटील यांच्याबरोबर आहे, त्यामुळे के. पी. पाटील यांचा विजय निश्चित आहे. केंद्रात मोदी व राज्यात फडणवीस यांच्या कार्यपद्धतीमुळे राज्य मागे पडले आहे त्यामुळे महा विकास आघाडीचे राज्य येण्यासाठी साऱ्यांनी हातभार लावूया. यावेळी बाबाजी नाईक, विलास पाटील, विश्वास जाधव, किरण कांबळे, विक्रम पटेकर, संकेत सावंत, मुकुंद तानवडे, के. जी. पटेकर, सुधीर जाधव, सचिन शिंपी, अहमदसाब मुराद, मंजूर मुजावर, आसिफ सोनेखान, बशीर इंचनाळकर यांच्यासह आजरा जिल्हा परिषद मतदार संघातील शिंपी यांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
=========================
बातमी व जाहिरात क्षेत्रातील विश्वसनीय 
विकास न्यूज 
सत्याचे प्रतिबिंब...
(संपर्क : 7410168989)
==========================

Wednesday, October 30, 2024

मडिलगे रेशन धान्य दुकानदाराकडून इ केवायसीच्या नावाखाली नागरिकांची आर्थिक लूट; आजरा तहसीलदारांना निवेदन

मडिलगे रेशन धान्य दुकानदाराकडून इ केवायसीच्या नावाखाली नागरिकांची आर्थिक लूट; आजरा तहसीलदारांना निवेदन 

आजरा वृत्तसेवा :

मडिलगे (ता. आजरा) येथील रेशन धान्य दुकानदाराकडून इ केवायसीच्या नावाखाली नागरिकांची आर्थिक लूट सुरु आहे. शासन स्तरावरून इ केवायसी साठी पैसे आकारणी करण्याबाबत कोणताही निर्णय नसताना रेशन धान्य दुकानदारांकडून पैसे आकारले जात आहेत, त्यामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त होतं आहे. याबाबतचे निवेदन आजरा तहसीलदारांना मडिलगे ग्रामस्थ व मडिलगे रास्त धान्य दुकान दक्षता कमिटीच्या सदस्यांनी दिले.
  
दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे, मडिलगे येथे भावेश्वरी विकास सेवा रेशन दुकानामार्फत रेशन वाटपाचे काम होतं. शासनाकडून रेशनकार्ड धारकांची इ केवायसी करणे हे काम चालू आहे. हे काम प्रत्येक गावातील रेशन धान्य दुकानामार्फत केले जात आहे. यासाठी कोणतेही पैसे घेऊ नये, असा शासन निर्णय आहे. मात्र  सदर कामासाठी मडिलगे येथील रेशन धान्य दुकानदारामार्फत माणसी वीस रुपये या प्रमाणे आकारणी संबधित दुकानदार नागरिकांकडून घेतले जात आहे. असा कोणताही पैसे घेण्याबाबतचा शासन निर्णय नसतानाही गोरगरीब जनतेकडून लुट होत आहे. तसेच वारंवार दक्षता कमिटीने मासिक सभा लावण्याची सूचना देवून सुद्धा दक्षता कमिटीची सभा घेतली जात नाही व रेशन वाटप करण्याचा वेळ स्वतः च्या मनमानीने चालू आहे. ग्रामपंचायत मासिक मिटिंग मध्ये त्या दुकानदाराला इ केवायसीच्या पैशाच्या विषयी विचारले असता उद्धट उत्तरे देण्यात आली. तरी सदर कामाची इ केवायसी मोफत करून मिळावी व ज्या रेशन धारकांकडून पैसे घेतले आहेत त्यांना पैसे परत मिळावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदनावर अभिजीत मोहिते, आनंदा घंटे बबन कातकर, विश्वजीत मुंज, सचिन कातकर, नितीन कातकर यांच्यासह ग्रामस्थांच्या सह्या आहेत.

============================
बातमी व जाहिरात क्षेत्रातील विश्वसनीय 
विकास न्यूज 
सत्याचे प्रतिबिंब...
(संपर्क : 7410168989)
==========================

इचलकरंजी पाणी पुरवठा व जीएसटी परतावा प्रश्नी लवकरच कार्यवाही : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; छत्रपती संभाजी महाराज ‘श्री शंभू तीर्थ’ पुतळ्याचे अनावरण

इचलकरंजी, विकास न्यूज नेटवर्क : महाराष्ट्राचे मिनी मँचेस्टर म्हणून ओळख असलेल्या आणि औद्योगिक कामगार नगरी असलेल्या इचलकरंजी शहरा...