Sunday, February 21, 2021

निपाणी-मुरगुड रोडवर आज मध्यरात्रीपासून नाकाबंदी

 

निपाणी (प्रतिनिधी) :

महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे बेळगाव जिल्हा प्रशासनाच्या सुचनेनुसार निपाणी शहर पोलिसांच्या वतीने रविवारी मध्यरात्रीपासून निपाणी मुरगुड रोडवर नाकाबंदी केली जाणार आहे. ही नाकाबंदी निपाणी मुरगुड रोडवर देवचंद कॉलेज समोर करण्यात येणार असून मुरगूडच्या दिशेने निपाणी शहरात येणाऱ्या वाहनांसह प्रवाशांची तपासणी होणार आहे. ही माहिती निपाणी शहर पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक अनिलकुमार कुंभार यांनी दिली. विशेष म्हणजे शनिवारी पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर कोगनोळी टोलनाका येथेही प्रशासनाने नाकामध्ये करून तपासणी सुरू होती. आता त्यापाठोपाठ निपाणी शहराला जोडणाऱ्या दुसऱ्या सीमेवरही कडक बंदी राहणार असल्याने आता निपाणी शहराकडे महाराष्ट्रातून येणारा प्रवेश अडचणीचा ठरला आहे. या  मार्गावर असलेल्या तपासणी चौकी अंतर्गत प्रवाशांची आरोग्य तपासणीसह येणार्‍या वाहनांच्या कागदपत्रांचीही तपासणी होणार आहे. यावेळी वाहनातील प्रवासी वर्गाला सर्दी, ताप, खोकला असल्यास त्या प्रवाशाला निपाणी शहरात कोणत्याही अटीवर प्रवेश दिला जाणार नाही. शिवाय महाराष्ट्रातील वाहन व प्रवासी असल्यास त्या प्रवाशाने किमान ७२ तासांपूर्वी आपली कोरोनाची टेस्ट केल्याचे प्रमाणपत्र दाखवणे अनिवार्य आहे.

बातमी व जाहिरात क्षेत्रातील विश्वसनीय 
विकास न्यूज 
सत्याचे प्रतिबिंब.....

कोल्हापूर जिल्ह्यात निर्बंधांचे पालन न करणार्‍यांवर सोमवारपासून कारवाईचे संकेत


कोल्हापूर (प्रतिनिधी) : 

महाराष्ट्र राज्यातील काही जिल्ह्यांत कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना रोखण्यासाठी जाहीर निर्बंधांचे पालन न करणाऱ्यांवर सोमवार (दि. २२ फेब्रुवारी) पासून कारवाई होणार आहे. लग्न समारंभासह सार्वजनिक कार्यक्रम, सभांवर निर्बंध आहेत. ते डावलल्यास कारवाईचे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिले आहेत. प्रतिबंधात्मक उपाययोजनांची कडक अंमलबजावणी, यापूर्वी दिलेल्या आदेशांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, असेही आदेशात म्हटले आहे. 

‘मास्क नाही, प्रवेश नाही’, ‘सामाजिक अंतर नसेल तर वितरणही नाही’ याची अंमलबजावणी व्यापारी दुकाने, खासगी व शासकीय आस्थापना, मॉल्स, फेरीवाले, भाजी-फळे विक्रेते, कारखाने, प्रवासी वाहने, ऑटो रिक्षा आदी ठिकाणी करावी. तंबाखूजन्य पदार्थ खाण्यास व थुंकण्यास परवानगी असणार नाही, असेही निर्देशित केले आहे. जिल्ह्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व पोलिस प्रशासन यांनी संयुक्तपणे या निर्देशांचे पालन सर्व सबंधितांकडून काटेकोरपणे होत असल्याबाबतची खात्री करावी, उल्लंघन दिसल्यास दंडात्मक कारवाई करावी, असेही आदेशात म्हटले आहे. 

प्रशासनाच्या सूचना 

- सार्वजनिक ठिकाणी सामाजिक अंतर राखावे
- सॅनिटायझरचा वापर करणे व स्वच्छता राखणे 
- सांस्कृतिक कार्यक्रम, लग्नसमारंभ, अंत्यंविधी, अंत्ययात्रा यासाठी ५० लोकांचीच उपस्थिती अनिवार्य
- आठवडा बाजाराला परवानगी, पण खबरदारी घ्यावी लागणार  
- प्रतिबंधित क्षेत्र वगळता उर्वरित क्षेत्रातील धार्मिक स्थाने, प्रार्थनास्थळे अटी व शर्तीवर सुरू 
- राजकीय सभा, मोर्चे, मिरवणुका, संमेलने यासारख्या मोठ्या कार्यक्रमांना बंदीच 
- शाळा, महाविद्यालये, खासगी शिकवण्या आदी ठिकाणी मास्क, सोशल डिस्टन्स आवश्‍यक 
- हॉटेल, बार, रेस्टॉरंटमध्ये ५० टक्केच ग्राहकांना परवानगी 
- स्थानिक स्वराज्य संस्थांनी सार्वजनिक शौचालये, बस, रेल्वे स्थानकांचे निर्जंतुकीकरण करावे 
- प्रवासा दरम्यान मास्कचा वापर बंधनकारक, अन्यथा दंड
- सर्दी, खोकला व तापाची लक्षणे असलेल्यांची कोरोना चाचणी करावी
- रुग्णाच्या संपर्कातील २० जणांची कोविड टेस्ट करावी 
- नागरी व ग्रामीण क्षेत्रातील कोविड केअर सेंटर, कोविड हॉस्पिटल सुसज्ज ठेवा
- वेगाने प्रसार करणाऱ्या व्यक्तींची वारंवार तपासणी करा

बातमी व जाहिरात क्षेत्रातील विश्वसनीय 
विकास न्यूज 
सत्याचे प्रतिबिंब.....

Wednesday, February 17, 2021

करंबळी ग्रामपंचायतीस आर. आर. (आबा) पाटील सुंदर ग्राम पुरस्कार प्रदान


गडहिंग्लज (प्रतिनिधी) :

करंबळी (ता. गडहिंग्लज) ग्रामपंचायतीस जिल्हा परिषद कोल्हापूर मार्फत सन २०२०-२१ सालचा स्व. आर. आर. (आबा) पाटील सुंदर ग्राम पुरस्कार आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. जिल्हा परिषदेच्या राजर्षी शाहू छत्रपती सभागृहात हा कार्यक्रम झाला. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बजरंग पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सतिश पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. यावेळी करंबळीचे सरपंच प्रविण माळी, ग्रा.पं सदस्य उमा सुतार, सविता पोवार, शोभा पाटील, शेवंता माळी, सुनिता कदम, तानाजी कणसे, गौतम कांबळे, एकनाथ गवस, ग्रामसेवक विक्रमसिंह महाजन तसेच ग्रामस्थांनी पुरस्कार स्विकारला.

गाव शैक्षणिक दृष्ट्या प्रगत आहे. महिला सबलीकरण योजना, देशसेवेत कार्यरत आजी माजी सैनिक संघटना, ग्रामपंचायतीने राबविलेले विविध उपक्रम, केलेली विकासकामे, अाद्ययावत ठेवलेले ग्रामपंचायतीचे रेकॉर्ड या निकषाच्या आधारे गडहिंग्लज तालुक्यात सर्वाधिक गुण मिळवून पुरस्कार प्राप्त केला आहे. दहा लाख रुपये व प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर सरपंच प्रविण माळी ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीला केलेल्या सहकार्यामुळे आपल्या गावाला हा पुरस्कार मिळाला अशा भावना व्यक्त केल्या.

बातमी व जाहिरात क्षेत्रातील विश्वसनीय 
विकास न्यूज 
सत्याचे प्रतिबिंब.....

इचलकरंजी पाणी पुरवठा व जीएसटी परतावा प्रश्नी लवकरच कार्यवाही : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; छत्रपती संभाजी महाराज ‘श्री शंभू तीर्थ’ पुतळ्याचे अनावरण

इचलकरंजी, विकास न्यूज नेटवर्क : महाराष्ट्राचे मिनी मँचेस्टर म्हणून ओळख असलेल्या आणि औद्योगिक कामगार नगरी असलेल्या इचलकरंजी शहरा...